आमदार आदर्श ग्राम योजनेत ग्रामपंचायत हा मूळ घटक आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीची या योजनेत निवड करणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत जूलै 2019 पर्यत तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून मा. आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करावयाच्या आहेत. सध्या एक ग्रामपंचायत निवडून मा. आमदारांनी जूलै, 2017 पर्यत पहिली ग्रामपंचायत विकसित करावयाची आहे. उर्वरीत दोन ग्रामपंचायती काही काळानंतर निवडून त्याच धर्तीवर ग्रामपंचायतीचा विकास करावयाचा आहे.
विधानसभा सदस्य आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडतील. विधानसभा सदस्यांचा मतदार संघ शहरी आणि ग्रामीण भागात विभागला गेला असेल तर ते मतदार संघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीची निवड करतील. विधानसभा सदस्यांचा मतदार संघ जर संपूर्णपणे शहरी असेल तर त्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्याच जिल्हयातील एका ग्रामपंचायतीची निवड करु शकतील. मुंबई परिसरातील शहरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधानसभा सदस्य राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीची निवड करु शकतील.
विधान परिषद सदस्य राज्यात कोणत्याही जिल्हयातून ग्रामपंचायतीची निवड करु शकतील. संबंधीत आमदार त्यांना योग्य वाटलेली ग्रामपंचायत निवडण्याचे स्वातंत्र्य राहिल. पण त्यांनी आपले स्वत:चे वा आपल्या पतीचे /पत्नीवे गाव निवडू नये. ग्रामपंचायतीची निवड करण्यापूर्वी संबंधीत ग्रामस्थांशी योजनेबाबत चर्चा करुन त्यांची योजनेतील सहभागाची तयारी समजून घेणे उचीत राहील. याकरीता ग्रामपंचायतीचा आवश्यक तपशील जसे की, लोकसंख्या इत्यादी आवश्यक माहिती ग्रामपंचायत निवडीच्या निर्णयाकरीता मा. आमदार यांना जिल्हाधिकारी उपलब्ध करुन देतील.