ठाणे जिल्हा परिषद

           

प्रस्तावना:

                भारतामध्ये सर्व प्रथम 1986 साली केंद्रीय पुरस्कृत ग्रामीण परिसर स्वच्छता कार्यक्रम (Centraly Sponsored Rural Sanitation Programme) सुरु झाला. स्वच्छतेशी निगडीत असलेला हा पहिला कार्यक्रम प्रामुख्याने ग्रामीण लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारणे हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरु केला होता. सन 1991 च्या जनगणनेत प्रथम घरांमधील शौचालयाची आकडेवारी जमा केली गेली होती. तेंव्हा ग्रामीण भागात हे प्रमाण निराशाजनक असल्याचे आढळून आले. केंद्र सरकारने देशभरातील 67 जिल्हयांमध्ये सन 1999 साली क्षेत्र सुधारणा पथदर्शक कार्यक्रम सुरु केला. प्रस्तावित मागणीधिष्ठीत पध्दतीतून काय बोध घेता येईल असा विचार यामागे होता. यासाठी महाराष्ट्रातून अमरावती, नांदेड, धुळे व रायगड या चार जिल्हयांची निवड करण्यात आली. सन 1986 ते 1999 या काळात या कार्याक्रमाच्या धोरणात आवश्यक बदल करण्यात आले. आज हा कार्यक्रम उदिष्टांवर अधारित नसून तो मागणी अधारित झाला आहे.

                स्वच्छ भारत मिशन (ग्रा) ची ठाणे जिल्हयात २० ऑगस्ट २००३ या वर्षामध्ये संपुर्ण स्वच्छता अभियान या नावाने केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री मा. श्रीम. सुर्यकांता पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करुन सुरुवात करण्यात आली. सन २००३-२०११ या कालावधीत जिल्हयात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) हे संपुर्ण स्वच्छता अभियान या नावाने राबविण्यात आले. त्यानंतर सन २०१२ या वर्षी संपुर्ण स्वच्छता अभियानाचे निर्मल भारत अभियान असे नामकरण करण्यात आले.त्यावेळेस ठाणे जिल्हयाचा (ठाणे व पालघर) सर्व्हे करण्यात आला. त्यांनतर ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्हयाचे विभाजन करण्यात आले होते. सदयस्थितीत  ठाणे जिल्हयात एकुण ०५ तालुके व ४३० ग्रामपंचायती आहेत.

                ठाणे जिल्हा मुंबई पासुन जवळ आहे. ठाणे जिल्हाचा विचार करता हा जिल्हा औदयोगिकरणात अग्रेसर आहे व नागरीकरण झपाटयाने होत आहे तसेच आदिवासी बहुल जिल्हा म्हणुन ठाणे जिल्हयाची ओळख आहे. २०१२ च्या पायाभुत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हयात एकुण ९१२२५ कुटुंबांकडे शौचालय सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले व त्यानुसार 31मार्च 2017  रोजी सन 2012 च्या पायाभुत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हयातील ४३० ग्रामपंचायती हागणदारमुक्त घोषीत करण्यात आल्या. त्यानंतर शासनस्तरावरुन देण्यात आलेल्या सुचनेनुसार जिल्हयातील 10524 वाढीव कुटूंबापैकी सदयास्थितीत 725 शौचालय कामे शिल्लक असुन उर्वरित सर्व कामे पुर्ण करुन घेण्यात आली आहेत. व तसेच सदयस्थितीत नवीन सर्वेनुसार शौचालय सुविधा उपलब्ध नसलेल्या 1780 कुटूंबाची केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर  नोंद करण्यात आली आहे.

        ग्रामीण भागांतील लोकांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागरुकता वाढविण्यासाठी आणि स्वच्छता सुविधांची मागणी निर्माण करण्यासाठी सन 1999 पासून संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून माहिती, शिक्षण व संवाद, मानवी संसाधन विकास, क्षमता उभारणी कार्यक्रम यावर भर देण्यात आला.

स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण स्वच्छतेची खात्री करुन उघडयावर मलविसर्जन करण्यापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने दिनांक 1/4/2012 पासून “निर्मल भारत अभियान सुरु करण्यात आले. स्वच्छतेच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना राष्ट्रपिताच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. यानंतर दिनांक 2 ऑक्टोंबर 2014 पासून स्वच्छतेचा हा कार्यक्रम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या नावाने सर्व भारतभर राबविण्यांत येत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रये रेषेच्या वरील आर्थिकदृष्टया मागास कुटूंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यांत येते. तसेच ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम आणि सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठीही ग्राम पंचायतींना अनुदान देण्यांत येते. वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करुन त्याची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत माहिती शिक्षण व संवाद (IEC) आणि क्षमता वर्धन या घटकांवर विशेष भर दिला जातो.

स्वच्छ भारत मिशन बाबत ग्रामीण भागातील लोकांना प्रवृत्त करणे :-

               स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेबाबत प्रवृत्त करणे व त्यांना शौचालय बांधकाम करण व त्याचा वापर करण्याबाबत प्रवृत्त करण्यासाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवुन आणणे ही एक मोठी समस्या होती.

                त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना शौचालयाचे महत्व व त्याचे फायदे व तोटे हे व त्यापासुन येणारे दुष्पपरिणाम याबाबत लोकांमध्ये मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात आली व ग्रामीण भागातील लोकांना शौचालय बांधकाम करणेसाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यासाठी जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामपंचायतस्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

1.  जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर मेळावे, आढावा बैठका, गटचर्चा, विशेष ग्रामसभा, महिला सभा, कोपरा बैठका घेण्यात आल्या.

2.  कलापथक, रोड शो, चित्ररथ, LED वाहन, स्थानिक वृत्तपत्रे, नाटक, घडिपत्रिका, बॅनर, चर्चासत्र, युवक मेळावे, महिला मेळावे, रॅली, एस.टी.महामंडळ जाहिरात, प्रशिक्षण. कार्यशाळा, गृहभेटी, स्टॉल इ. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमांतुन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन सांगण्यात आले व त्यांना शौचालय बांधकाम करुन त्यांचा वापर करणेसाठी प्रवृत्त करण्यात आले.

  1. स्वच्छतेचा थेट आरोग्याशी काय संबंध आहे याचे देखील महत्व लोकांना पटवुन सांगण्यात आले.

 

स्वच्छता अभियानमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग :-

  1. जिल्हयात भारत मिशन (ग्रा) अभियान राबविताना सर्व घटकांना सामावुन घेण्यात आले होते. पंरतु प्रत्यक्षात क्षेत्रिय भेटी दरम्यान असे निदर्शनास आले की, पाहिजे तेवढे यश मिळत नव्हते. त्यामुळे मग स्वच्छता अभियानामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याकडे लक्ष देण्यात आले.
  2. घरात सर्वात जास्त संबंध स्वच्छतेचा महिलांशी येतो (धुणे-भांडी, पिण्याचे पाणी, घरातील परिसर, लहान मुलांची स्वच्छता, स्वयंपाक) त्यामुळे यामध्ये आम्ही जास्तीत जास्त महिलांना समाविष्ट करुन घेण्यात आले.
  3. महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी महिलांच्या ग्रामसभा, ग्रामपंचायस्तरावर महिलांच्या बैठका, तालुकास्तरावर महिलांचे प्रशिक्षण, कार्यशाळा, अभ्यास सहल व महिला बचत गटाच्या माध्यमातुन स्वच्छतेच्या कामास प्राधान्य देऊन जास्तीत जास्त महिलांना या कामात समाविष्ट करुन घेण्यात आले.
  4. उत्कृष्ट काम करणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस महिलांचा सत्कार करण्यत आला व त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
  5. महिला आर्थिक विकास महामंडळ, MSRLM इ. विभागांशी योग्य समन्वय साधुन महिलांचा सहभाग वाढविण्यात आला.

शाळेतील विदयार्थाचा सक्रिय सहभाग :-

  1. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत काम करताना सर्व घटकांना सामावुन घेऊन काम करण्यात आले. परंतु यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शाळेतील विदयार्थी. हे विदयार्थी देशाचे भावी नागरीक व देशाची संपत्ती असल्याने त्यांनाही यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले.
  2. त्यासाठी शाळेतील मुलांच्या रॅली, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, विदयार्थी स्वच्छतादुत हे उपक्रम जिल्हयात राबविण्यात आले व तसेच यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आम्हाला यश मिळाले.
  3. लहन मुलांमार्फत कुटुंबांतील सर्व सदस्यांना स्वच्छतेबाबत जाणीव जागृती होण्यास मदत झाली.

 

स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी वापरण्यात येणारे मार्ग व माध्यमे :-

स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमांचा वापर करण्यात येतो.

  1. Whatssapp Group, Facebook, Bulk SMS, आंतरव्यक्ती संवाद, बाहय माध्यमे, रेडिओ, वृत्तपत्र जाहिरात, हस्तपत्रिका, घडिपत्रिका, दिनदर्शिका, दुरदर्शन वरील जाहिरात, प्रदर्शने, अभ्यास दौरा, प्रात्यक्षिके इ. माध्यमाचा वापर करुन जिल्हयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेविषयी प्रवृत्त करण्यात आले.

 

इतर विभागांचा स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग :-

                      स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्हयात काम करताना  यश प्राप्त झाले परंतु १००% यश प्राप्त झाल्याचे निदर्शनास येत नव्हते. त्यामुळे जिल्हास्तरावर इतर विभागांचा सुदधा सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक होते.

  1. शिक्षण विभाग - स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत काम करताना शाळेतील मुलांचा, शिक्षकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे सेच शाळेतील मुलांना स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करुन प्रवृत्त करणेकरिता शिक्षण विभागाशी समन्वय ठेवण्यात येतो.
  2. महिला व बालकल्याण विभाग – महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर काम करणा-या अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांची देखील ग्रामपंचायतस्तरावर मदत घेणे अपेक्षित होते त्यासाठी या विभागाशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत आहे.
  3. आरोग्य विभाग- आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर काम करणारे आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती यांची देखील ग्रामपंचायतस्तरावर मदत घेण्यात आली.
  4. MSRLM – MSRLM अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर काम करणा-या महिला बचत गटांचा देखील सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे व यामुळे स्वच्छतेच्या कामामत गती येऊ शकते.

वरील सर्व विभागाशी योग्य पदधतीने समन्वय ठेवण्यात आला त्यामुळे स्वच्छतेच्या कामात प्रगती दिुसुन आली.